Friday, 8 June 2018

रोज सकाळी लवकरच निघतो घरातून  गजर नाही लावत पण " साखरझोप आणि  रम्य पहाट " यांच्या लढाईत पहाट जिंकते आणि मला जाग करते  दरवाजा उघडला की बाहेरच्या वसरीत आराम खुर्चीवर बसलेली आमची मांजर ही क्षणात जागी होते , पायात घुटमळत ती ही जाते बाहेर , तयार होऊन बाहेर पडलो काळोख असतो कुठेतरी तांबडं पडायची सुरुवात झालेली असते , वाऱ्याचा एक बेधुंद शहारा अंगाला स्पर्श करतो आणि रात्रीचा आळस प्रसन्न मुद्रा घेत बाहेर ढकलून देतो .
              पावलं झपझप सुरू झाली , रस्त्यावर आलो की सगळी निरव शांततेत , पक्ष्यांचा जोरात आंनदोउत्सव सुरू असतो , दिवसाच्या संगीत मैफली पेक्षा हा अधिक सुरात वाटतो , घर झोपलेली असतात . रात्रीचे दिवे अजून ही चालूच असतात कुणीतरी माऊली झाडू घेऊन भलं मोठं अंगण झाडत असते तुळशीच्या वृंदावनात अगरबत्तीचा सुगंध दरवळत असतो सूर्यदेव ही अजून घरातच असतात .
      तो पर्यंत चौक ही उठायच्या तयारीत असतो प्रसन्न मुद्रेत " छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा " पहाटेच्या फिकट अंधारात नवचैतन्य देतो , रोज पुतळ्याकडे  बघत महाराजांच व्यक्तिमत्त्व , पराक्रमी देहबोली समोर उभी राहते , चहावाल्याची अजून सुरवात व्हायची असते दूध तापत असतं , पेपर वाला सायकल दामट असतो जशी काय जगाची खबर जग उठायच्या आत पोचवायची घाई असते त्याला .
        तिथुन पुढे प्रवास रस्त्यावर येतो , पीर साहेबांची दर्गा ,रस्त्यानेच नमस्कार होतो फुलं दिसतात मजार वर आणि पावलं सुरू होतात , रस्त्याला आता गर्दी असते भले पहाटे अनेक जण माझ्या आधी हजर असतात . आमची पिढी कानाला हेडफोन पायात शूज जोरात असते   आणि आमची जूनी पिढी ही असते , रोजचेच टोळके असतात काही मित्र वयाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलेली आहेत तरी हसत , बोलत , मस्करीत चालत असतात .
       आजीला घेऊन फिरायला आलेले आजोबा बॅटरी घेऊन पुढे आणि बळजबरीने चालणारी आज्जी मागेच असते काही शरीर आणि व्यायाम प्रेमी आमचे प्रेरणास्थान कित्येक वर्षांपासून तिथेच भेटतात माझ्याकडे  तिरक्या नजरेने हसत हसतात  , पलीकडे महादेव मंदिरात सुंदर गजर चालू असतो . घटनांद ऐकू येत असतो .
        गेली कित्येक वर्षे ही पहाट झोपुच देत नाही , रोज तांबड्या आकाशाची नवलाई घेईन जाते बरोबर , भला मोठा रस्त्याचा उतार संपतो , पावलं आता वेगवान होतात अंगातला गारवा जाऊन शरीर घामाच्या धाराना जवळ करत असत बेभान वाहन रस्त्यावर पळत असतात साधारण अडीच किलोमीटर अंतर पार झालेलं असत आणि  परतीचा प्रवास सुरू होतो .
         परतीच्या वाटेवर घराकडून कामाला निघालेले चाकरमानी गाड्यावर दिसू लागतात रेल्वे च्या घाईत , अंधार जाऊन तांबडं उजेडात गाव नाहून निघालेलं असतं अजूनही काही शहरीकरण पोचलं नाही तेच सुखावून जात. गाव आता जाग झालेलं असत दुकान थाटलेली असतात चौकात पांढऱ्या रंगातले अनेकजण वर्तमानपत्रावर तुटुन पडलेली  असतात , हॉटेलात घमघमात सुटलेला असतो .घर जागी झालेली असतात .
         जशी गर्दी वाढायला लागते , तसा मी मात्र एकटा पडत असतो . घर जवळ येत पहाटेच्या  बेधुंदीत भेटलेलो  मी आता परत भेटत नाही .........
✍ दस्तगीर सय्यद
 ( आयुष्याच्या डायरीतून )  ९/६/१८
Dastgeersayyadblogspot.com

No comments:

Post a Comment